नवी दिल्ली : कोचीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात आज एका इंजिनमध्ये आग लागल्याचे आढळून आल्यानंतर ते रिकामे करण्यात आले. ओमानमधील मस्कत विमानतळावर टेकऑफच्या आधी हा प्रकार घडला. सर्व क्रू आणि 145 प्रवासी, यांना विमानातून बाहेर काढण्यात आले आणि टर्मिनल इमारतीत हलवण्यात आले. यात चार लहान बाळांचा समावेश आहे. कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. नागरी उड्डाण महासंचालनालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “रिलीफ फ्लाइटचे आयोजन केले जाईल.”
मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानातून धूर निघू लागला. वृत्तानुसार, प्रवासी विमानातून धूर निघू लागल्यानंतर एअर इंडियाच्या विमानातून प्रवाशांना स्लाइड्सवर बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी विमान कोचीला रवाना होणार होते, तेव्हा विमान रिकामे करण्यास सांगण्यात आले. सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटी (CAA) मस्कतने सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीनंतर मस्कत विमानतळावरील संबंधित अधिकाऱ्यांशी ते बोलत आहेत.
डीजीसीए कडून निवेदन जारी
डीजीसीएने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “इंजिन क्रमांक 2 मध्ये धूर आढळून आल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. रिलीफ फ्लाइटची व्यवस्था केली जाईल. आम्ही या घटनेची चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू.”




