मुंबई : चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तात्काळ स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूणचे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा चिपळूण शहराला सगळ्यात मोठा फटका बसला होता. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचे या पुरामुळे अतोनात नुकसान झाले. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी हा 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याशिवाय शहरातील स्वच्छता कार्याला वेग आणण्यासाठी मुख्याधिकारी दर्जाचे 5 अधिकारी तातडीने नियुक्त करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले आहे.
शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी साधने आणि मनुष्यबळ गरजेचे आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या स्वच्छता साधनसामग्रीसह पाठवू असंही त्यांनी सांगितलं. चिपळूण शहराला नदीच्या पाण्यापासून असलेला धोका लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून लागणारे बोटी, लाईफ जॅकेट्स यासारखे साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्याची सूचना त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना केली.




