ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्गांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने गुरुवारीच ही माहिती दिली. त्यानुसार पंतप्रधान मोदी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यानंतर त्यांचे भाषणही होणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग मोदी राष्ट्राला समर्पित करतील, असे निवेदनात म्हटले आहे.
जारी केलेल्या निवेदनानुसार, कल्याण हे मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन आहे. देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागातून येणारी वाहतूक कल्याणला जोडते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSTM) च्या दिशेने जाते. कल्याण आणि सीएसटीएम दरम्यानच्या चार रेल्वे मार्गांपैकी, दोन ट्रॅक धीम्या लोकल गाड्यांसाठी आणि दोन जलद लोकल, मेल एक्सप्रेस आणि मालगाड्यांसाठी वापरण्यात आले होते. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्या वेगळ्या करण्यासाठी दोन अतिरिक्त मार्गांचे नियोजन करण्यात आले होते.
उल्लेखनीय म्हणजे, MUTP II अंतर्गत २००८-०९ मध्ये मंजूर असलेला हा प्रकल्प रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात समान खर्चाच्या वाटणीसह रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) द्वारे कार्यान्वित करण्यात आला आहे. ठाणे आणि दिवा यांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग सुमारे 620 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले असून त्यात 1.4 किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, तीन मोठे पूल, 21 छोटे पूल यांचा समावेश आहे. या मार्गांमुळे मुंबईतील लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीतील तसेच उपनगरीय रेल्वे वाहतुकीतील व्यत्यय मोठ्या प्रमाणात दूर होईल. यासह 36 नवीन उपनगरीय गाड्याही शहरात धावणार आहेत. हा ६ प्लॅटफॉर्म आणि ८ फूट ओव्हर ब्रिज आणि पादचारी पूलांचा विस्तार असलेला रेल्वे मार्ग असेल.
या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.
५ व्या आणि ६ व्या मार्गीकेमुळे होणारे फायदे:
- कुर्ला ते कल्याण या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग वेगळे होतील. लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ल्याजवळ) येथून निघणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उपनगरीय वाहतुकीला अडथळा न आणता ५ व्या आणि ६व्या मार्गावर कल्याणपर्यंत जाऊ शकतात.
- ३६ अतिरिक्त उपनगरीय सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान आणि पुढे (३४ वातानुकूलित आणि २ विना-वातानुकूलित) सुरू केल्या जातील.
- मेगाब्लॉकदरम्यान उपनगरीय गाड्या एकाच कॉरिडॉरमध्ये प्रवाशांना सेवा पुरवतील. त्यामुळे कळवा, मुंब्रा या कॉरिडॉरच्या प्रवाशांना मोठा फायदा होईल.




