अहमदनगर : लग्नाला अवघे काही महिने झालेल्या नवदाम्पत्याचे मृतदेह आढळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या जोडप्याचे मृतदेह दोरीच्या सहाय्याने झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, या दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर येथे ही दुर्दैवी घटना घडली. रविवारी (११ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वैभव दत्तात्रेय आमले (वय २२) आणि स्नेहा वैभव आमले (वय २०) या दोघांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नाच्या काही महिन्यानंतरच नवविवाहित दाम्पत्यांने रविवारी सायंकाळी साकूर येथील मुळा नदीच्या जवळील मांगमळीत एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची चर्चा आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या नवदाम्पत्याने आत्महत्या का केली असावी याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. परंतू ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत घारगाव पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि साकूर गावचे ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली. घारगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. यामागील कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या नवदाम्पत्याने आत्महत्या केली की हा अन्य काही प्रकार आहे? आत्महत्या केली असेल तर त्यामागील नेमकं काय कारण? याबाबत अधिक तपास घारगाव पोलीस करीत आहे.




