वाढीव वीज बिलाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर ‘अदानी ग्रुप’च्या सीईओनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ‘कृष्णकुंज’ येथे जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर वीज वितरण कंपन्यांनी राज्यातील ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं पाठवली. जनतेचा आक्रोश वाढत जाईल. जनतेला वीज बिलात सूट द्या, जनक्षोभ झाल्यास मनसे सामान्य नागरिकांच्या बाजूने असेल, असा इशारा राज ठाकरे यांनी ‘अदानी ग्रुप’ला दिला, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.
‘अदानी ग्रुप’ हे व्यवसाय करत आहेत, हे मान्य आहे, मात्र अशा अपवादात्म्क परिस्थितीत व्यवसाय बाजूला ठेवा आणि मार्ग काढा” अशा सूचना त्यांना दिल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. “ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळोवेळी या मुद्द्याकडे लक्ष वेधले, परंतु अजूनही याबाबत काहीच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, राज ठाकरे यांनी वीज वितरण कंपन्यांच्या वाढीव बिलावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती.




