पुणे : तीन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडली आहे. रात्री उशिरा तिघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. दौंड शहरातील कुरकुंभ रस्त्यावरील मोरवस्तीजवळ महापालिकेच्या पाणी साठवण तलावात तीन मित्रांचा बुडून मृत्यू झाला. तलावावर फोटोशूट करताना पाण्यात पडून तिघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. असरार अलीम काझी (21), करीम अब्दुल दाही फरीद काझी (20) आणि अतीक उज्जामा फरीद शेख अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (६ मार्च) दुपारी चारच्या सुमारास ते सायकलवरून निघाले होते. मात्र, ते घरी न परतल्याने घरच्यांनी रात्री उशिरा त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीही फोन उचलला नाही. त्यामुळे तिघांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर, हे तिघे दौंड महानगरपालिकेचा जलसाठा तलाव पाहण्यासाठी जात होते, अशी माहिती त्यांना मिळाली.
दौंड पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने तलावाच्या पाण्यात मुलांचा शोध घेतला. रात्री 12.30 च्या सुमारास तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये असरार हा बीएची परीक्षा उत्तीर्ण झाला होता व पुढील शिक्षण घेत होता. त्याचा चुलत भाऊ करीम आणि त्याचा मित्र अतिक दोघेही पूना कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स शिकत होते. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.




