मुंबई : महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) श्रीकांत देशपांडे यांनी माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात आता मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक केले जाणार आहे. यासोबतच देशपांडे म्हणाले की, १ ऑगस्ट २०२२ पासून संपूर्ण राज्यात याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
श्रीकांत देशपांडे म्हणाले की, मतदारांची ओळख पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीतील नोंदी प्रमाणित करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. कारण आता मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडले जाणार असून, यामुळे एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा केली गेली आहे का हे समजण्यास फायदा होईल. भारत निवडणूक आयोग 1 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याची मोहीम सुरू करणार आहे.
निवडणूक कायदा (सुधारणा) कायद्याला आव्हान देणारे काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मतदार यादी आधारशी जोडण्याच्या तरतुदीला आव्हान देत उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने सुरजेवाला यांच्या वकिलाला विचारले की त्यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात धाव का घेतली नाही. खंडपीठ म्हणाले, तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयात का जात नाही? तुम्ही निवडणूक कायदा (सुधारणा) कायदा, २०२१ च्या कलम ४ आणि ५ ला आव्हान देत आहात. इथे का आलात? तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयात जाऊ शकता.
काँग्रेस नेत्याची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितले की, पुढील सहा महिन्यांत तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यावर “कायद्यात उपलब्ध उपाय लक्षात घेता, आम्ही याचिकाकर्त्याला अनुच्छेद 226 (संविधानाच्या) अंतर्गत सक्षम उच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करण्याचे स्वातंत्र्य देतो,” असे खंडपीठाने सांगितले.




