बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील टाकरखेड वायाळ (ता. देऊळगाव राजा) येथे मंगळवारी (दि. 5 ऑगस्ट) दुपारी एक नवविवाहिता विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. दिपाली वैभव बनसोडे (वय 26) असे या महिलेचे नाव असून, केवळ साडेतीन महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. या प्रकरणाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
मूळची मिसाळवाडी (ता. देऊळगाव राजा) येथील दिपाली ही गणेश प्रल्हाद साळवे यांची कन्या होती. 19 एप्रिल 2025 रोजी तिचा विवाह समाजाच्या रीतिरिवाजानुसार टाकरखेड वायाळ येथील वैभव बनसोडे याच्यासोबत झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दिपाली मंगळवारी सकाळी शेतात कामासाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. मात्र दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान ती परत न आल्याने काही महिला शेतशिवारात तिचा शोध घेऊ लागल्या. यावेळी एका विहिरीत पाण्यावर तिच्या चपला तरंगताना आढळून आल्या. महिलांनी तत्काळ गावकऱ्यांना बोलावून घेतले आणि पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच अंधेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम व बीट जमादार गजानन वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
दरम्यान, दिपालीच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हा अपघात आहे की आत्महत्येचा प्रकार, याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, तिच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी होत्या का, मानसिक तणाव होता का, यासंबंधीही चौकशी करण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कोणतीही शक्यता नाकारलेली नसून, सर्व अंगाने तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.




