मुंबई : राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग कमी असलेल्या जिल्ह्यात निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेने देखील पत्रक जाहीर करून मुंबईकरांना काही प्रमाणात सवलत दिली आहे. मात्र, सर्वसामान्यांसाठी लोकल अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत म्हटले कि, “मुख्यमंत्री साहेब सर्व आस्थापना सुरू केल्याबद्दल आपले आभार. मात्र, लोकल बंद आहेत. बसला प्रचंड वेळ लागतो. गर्दीही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण ‘शिव पंख’ लावून दिलेत तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण होणार नाही. मला खात्री आहे आपण हे करू शकता, आमचा सीएम जगात भारी.”
सी.एम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार.लोकल बंद आहेत बस ला प्रचंड वेळ लागतो गर्दी ही असते.आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण “शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण नाही.मला खात्री आहे आपण हे करू शकता आमचा सीएम जगात भारी
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 3, 2021
कोरोना संसर्गाचा दर व ऑक्सिजन बेडची उपलब्धता पाहून निर्बंध शिथील केले जात आहेत. सर्व सरकारी व खासगी कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तरी लोकल बंदी मात्र कायम आहे. किमान लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी विरोधकांची मागणी आहे.




