मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक आमदारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यांच्यासोबत आमदार चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी नेतेही होते. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर फ्लोर टेस्टची मागणी केली.
मंगळवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला. राजभवनातून बाहेर आल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांना माहिती दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यपालांना आज ईमेलद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून भाजपने पत्र दिलेलं आहे. या पत्रात राज्याची आताची परिस्थिती आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. शिवसेनेचे ३९ आमदार बाहेर आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. याचा साधा अर्थ आहे, ते ३९ आमदार सरकारसोबत नाहीत. त्यामुळे सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाहीय. सरकारला बहुमत सिद्ध करायला लावावं, यासाठीचं पत्र आम्ही राज्यपालांना दिलेलं आहे.
या पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा उल्लेख केला आहे. या पत्रावर राज्यपाल उचित निर्णय घेतील. मेजॉरिटी सिद्ध करण्यासाठी योग्य ते निर्देश देतील अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार असं भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर गेलं होतं.
आज देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या महाराष्ट्र युनिटची कोअर कमिटीची बैठक पार पडली, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला गेले. दिल्लीत त्यांनी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याचे समजते.




