महाराष्ट्र केसरी 2025: राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले आहे. अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेचा अंतिम सामना पै. शिवराज राक्षे आणि पै. पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पार पडला. यावेळी पृथ्वीराज मोहोळने अवघ्या काही सेकंदात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा पराभव केला. या पराभवाने संतापलेल्या शिवराज राक्षेने थेट पंचाची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली. यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला.
महाराष्ट्र केसरी 2025 ची अंतिम लढत नांदेडच्या शिवराज राक्षे आणि पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. पृथ्वीराज मोहोळने काही सेकंदात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला हरवले. पण शिवराजला त्याचा पराभव मान्य झाला नाही. त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. सुरुवातीला त्याचे सहकारी पंचांना बोलायला गेले, त्यावेळी त्यांची पंचांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली.
यानंतर शिवराज तिथे आला, त्यानेही सुरुवातीला पंचांसोबत हुज्जत घातली आणि शेवटी राग अनावर झाल्याने त्याने पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली. “माझी पाठ टेकली नव्हती,” असे म्हणत शिवराज राक्षेने पराभव अमान्य केला. या गोंधळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि शिवराजला दूर केले.
या घटनेनंतर शिवराजने व्यासपीठावर खासदार पृथ्वीराज मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलण्याचा प्रयत्न केला. आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




