94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. नारळीकर यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा आज नाशिकमध्ये करण्यात आली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिक ठाले पाटील यांनी याबाबत घोषणा केली. 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये 26, 27, 28 मार्चला होणार आहे.
कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, नारळीकर यांच्या पत्नी मंगलाताईंनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे बैठकीला वेळ लागला आणि त्यावर सविस्तर चर्चा झाली. नारळीकर सरांनी इथे प्रत्यक्षपणे उपस्थित रहावे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. संमेलनाचे उद्घाटन हे लेखक किंवा लेखिकाच करतील. राजकीय व्यक्ती करणार नाहीत. संमेलनाला राजकीय व्यक्ती वर्ज्य नाही, संमेलनाला ते येऊ शकतात, असं ते म्हणाले. कोरोनाच्या काळात नाशिककरांनी खूप मोठी जोखिम पत्करली आहे. सर्व नियम पाळण्याचे आम्ही प्रयत्न करू.
एखाद्या विज्ञान लेखकाला पहिल्यांदाच साहित्य संमेलानाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. साहित्य महामंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज जवळपास तीन तास पार पडलेल्या बैठकीत नारळीकरांच्या नावावर अखेर एकमत झाले.




