परभणी : राज्यातील विविध जिल्ह्यात या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हाती आलेली पिकं या परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. विषारी औषध घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. गुलाब जीवने (वय, 24 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीन पिकाचं नुकसान आणि खासगी फायनान्सचे घेतलेलं कर्ज कसं फेडायचे या विवंचनेतून गुलाब जीवने यांनी आत्महत्या केली आहे. तरुण शेतकरी गुलाब जीवने यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. या शेतात त्यांनी सोयाबीन लावले होते. मात्र, परतीच्या पावसाने हे सोयाबीन वाया गेले. त्यातच खासगी फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज डोक्यावर आणि नुकसान पाहता हे कर्ज फेडायचे कसे व आपला प्रपंच चालवायचा कसा या विवंचनेत गुलाब जीवने यांनी विषारी औषध प्राशन केले. या घटनेनंतर तत्काळ गावकऱ्यांनी त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार करुन त्यांना परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी गुलाब जीवने यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात लहान भाऊ आणि आई आहे.
शेतकरी आंदोलन : आणखी एका शेतकऱ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या




