13 जुलै 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्दयतेने हत्या केली होती. या प्रकरणातील तीन आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपींना फाशी दिली जावी, या मागणीसाठी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात मोर्चे व आंदोलनं झाली होती. अखेर न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता या घटनेला आठ वर्षे झाली आहेत. आज पीडित मुलीच्या बहिणीचं लग्न होतं, आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विवाह सोहळ्याला हजर होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “विवाहाचं निमंत्रण आलं होतं, म्हणून मी कोपर्डीत आलो. वधू-वराला शुभेच्छा दिल्या. आज दोन कुटुंबं एकत्र येत आहेत आणि सर्व लोक वधू-वराला आर्शीवाद देण्यासाठी या विवाह सोहळ्याला आले आहेत.”
दरम्यान, शनिवारी शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर भाष्य करत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेसला 80 लाख मतं मिळाली तरी त्यांना फक्त 16 जागा मिळाल्या, तर शिवसेना शिंदे गटाला 79 लाख मतं मिळाली, पण त्यांना 57 जागा मिळाल्या. यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी जनतेचं ऐकावं, कार्यकर्त्यांच्या खोट्या बोलण्याचं ऐकू नये. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पराभव स्विकारला पाहिजे. पवार साहेबांनी जनतेचं मत स्वीकारलं पाहिजे. लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडेल, अशा प्रकारची वक्तव्यं किमान शरद पवार यांनी तरी करू नयेत. पवार साहेबांना माहीत आहे, पराभव नेमका कशामुळे झाला.




