वर्धा : वर्धा जिल्ह्यातील शेडगाव जवळील जुनापाणी परिसरात चिमुकल्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. बहीण- भाऊ शेतात खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली. शेतातील तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात राहणारे पंचभाई यांचे शेडगाव येथील जुनापाणी परिसरात शेत आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील एका कुटुंबाला शेतीच्या कामासाठी आणले होते. हे कुटुंब त्यांच्या दोन मुलांसह शेतातील एका घरात राहते. काळ संध्याकाळच्या सुमारास या चिमुकल्यांचे आई- वडील शेतात काम करत होते आणि शीतल शैलेश कुमरे (वय 5) व शिवम शैलेश कुमरे (वय 3) ही भावंडं शेतातील परिसरात असलेल्या तलावाजवळ खेळत होती. रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुले घरी न आल्याने आई- वडिलांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी दोन्ही मुलांचे मृतदेह तलावात दिसले.
घटना उघडकीस आल्यानंतर याबाबत समुद्रपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.




