पुणे : पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम होणे आता नित्याचे झाले आहे. एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जादा टोल भरूनही नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग 2002 मध्ये बांधण्यात आला. या 94 किमी महामार्गामुळे पुणे आणि मुंबईमधील अंतर कमी झाले. दोन शहरांमधील प्रवास अधिक गतिमान झाला. मात्र 2002 नंतर आता 2023 मध्ये या महामार्गावरील वाहनांची संख्या वाढली आहे. या ‘एक्स्प्रेस वे’वर आता क्षमतेपेक्षा जास्त वाहने धावत आहेत. त्यामुळे अपघात व वाहतूक कोंडी होत आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या मार्गावर आणखी लेन जोडण्यात येणार आहेत.
काय आहे निर्णय?
आता राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे या रस्त्यावर दोन लेन वाढणार असून वाहतूक कोंडी संपणार आहे.
क्षमता किती होती?
मुंबई पुणे एक्सप्रेस वे बनवताना भविष्याचा विचार करण्यात आला. या मार्गावरून दररोज 40 हजार वाहने जातील, असा आराखडा घेऊन महामार्ग तयार करण्यात आला होता. मात्र आता या महामार्गावरून दररोज 60 हजार वाहने जात आहेत. वीकेंडला म्हणजे शनिवार आणि रविवारी हा आकडा 80 ते 90 हजारांवर जातो. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर नेहमीच वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यात दरड कोसळल्याने महामार्ग ठप्प झाला होता. तसेच अपघातांमुळेदेखील या समस्येत भर पडते.
आता आठ लेन होणार
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग सध्या सहा पदरी आहे. या ठिकाणी आठ मार्गिका बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी जागा संपादित करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी जागा असेल, तसेच बोगदा, पूल आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी साडेचार हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.
जुन्या मार्गावर लेन वाढवणार
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाप्रमाणेच जुन्या मार्गावरही दोन लेनचा विस्तार करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. दोन्ही रस्त्यांवर चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न संपुष्टात येईल.




