अहमदनगर : नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी काही निर्बंध लावले आहेत. त्यानुसार खातेदारांना १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. याशिवाय इतरही बंधने लादण्यात आली आहेत. गेल्याच आठवड्यात बँकेची निवडणूक झाली. प्रदीर्घ प्रशासकीय राजवट संपवून दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या गटाने पुन्हा सत्ता मिळविली आहे. त्यातच आता नव्याने आलेल्या संचालक मंडळाला या आव्हानांशी सामना करावा लागणार आहे. नगर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्हे आणि गुजरातमध्येही या बँकेच्या शाखा आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेचा हा आदेश सोमवारी संध्याकाळी मिळाला आहे. त्यानुसार कलम ३५ ए आणि कलम ५६ नुसार आजपासून पुढील सहा महिन्यांसाठी बँकेवर विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाला कोणतेही नवीन कर्ज मंजुरी, जुन्या कर्जाचे नुतनीकरण, अॅडव्हान्स मंजूर करणे, कोणतीही गुंतवणूक करणे, नवीन ठेवी स्वीकारणे, ठेवी मोडणे, मालमत्ता हस्तांतरण अशा व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय खातेदारांना त्यांच्या बचत खात्यातून, चालू खात्यातून किंवा अन्य कोणत्याही खात्यातून दहा हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. या नियमामुळे सामान्य खातेदार, व्यापारी, ज्यांची बचत तसंच व्यावसायिक खाती या बँकेत आहेत त्यांची तसेच ठेवीदारांचीही मोठी अडचण होणार आहे.




