अहमदनगर : मित्रांबरोबर पोहायला गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. केतन शशिकांत लोंढे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. बुधवारी दुपारी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी (गणेशा) येथे ही दुःखद घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केतन नुकताच पोहायला शिकला होता. त्याची शाळा सध्या सकाळी सात ते दुपारी साडेबारापर्यंत असायची. शाळेतून आल्यानंतर दुपारच्या सुमारास परिसरातील आठ – दहा मुले राहुल नलवडे यांच्या शेतातील विहिरीवर पोहायला गेली होती. सुमारे दोन तास पोहून झाल्यानंतर केतन पुन्हा सर्वांची नजर चुकवून विहिरीत गेला. काही वेळाने सर्व मुले बाहेर आलेली दिसत होती, पण त्यांच्यामध्ये केतन कुठे दिसत नव्हता. त्यानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र, केतन कुठेही सापडला नाही, त्यामुळे अमोल मोटे, जीवन कापडे, अमोल देशमुख, गोटू गवते, बंडू चोभे यांनी वेळ न दवडता विहिरीत उड्या मारून शोध घेतला; परंतु विहिरीची पाणीपातळी जास्त असल्याने तरुणांना पाण्यात खोलपर्यंत जाता येईना. अनेकांची खात्री पटली की, केतन पाण्यात बुडाला असावा.
यावेळी येथे लाईट गेलेली असल्यामुळे पाणी उपसता येईना. त्यानंतर अधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर वीजपुरवठा सुरु झाला. मग विहिरीवरील इंजिनसह पाच विद्युत पंप जोडून पाणी उपसण्यात आले. सायंकाळी चार वाजता केतनचा मृतदेह पाण्यात तळाला सापडला. त्यानंतर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली, पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला, त्यानंतर मृतदेह श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. रात्री उशीरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केतन हा नववीत शिक्षण घेत होता आणि शाळेत हुशार होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




