गीतकार अभिलाष यांचे मुंबईत निधन झाले आहे. 74 वर्षीय अभिलाष यांनी रविवारी गोरेगाव येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिलाष गेल्या काही महिन्यांपासून यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. मागील 10 महिन्यांपासून ते अंथरुणाला खिळून होते. आज पहाटे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गीतकार अभिलाष यांनी १९८५ मध्ये ‘अंकुश’ या चित्रपटासाठी लिहीलेली प्रार्थना ‘इतनी शक्ती हमे देना दाता…’ विशेष गाजली. या प्रार्थनेचा 8 भाषांमध्ये अनुवाद देखील करण्यात आला आहे. आजही अनेक शाळांमध्ये ही प्रार्थना म्हटली जाते. या प्रार्थनेसोबतच अभिलाष यांनी ‘सांझ भई घर आजा’, ‘तुम्हारी याद के सागर में’, ‘संसार है इक नदिया’, ‘तेरे बिन सूना मेरे मन का मंदिर’ ही गाणी रचली होती. याशिवाय ‘रफ्तार’, ‘जहरिली’, ‘सावन को आने दो’, ‘लाल चूडा’, ‘हलचल’ आणि ‘मोक्ष’ सारख्या चित्रपटांसाठीदेखील त्यांनी गाणी लिहिली होती. गीतकार अभिलाष यांना माजी राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंह यांच्या हस्ते ‘कलाश्री पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले होते.
13 मार्च 1946 रोजी दिल्लीत अभिलाष यांचा जन्म झाला. अभिलाष यांचे वडील व्यावसायिक होते. अभिलाष यांची रूची कला-साहित्यक्षेत्राकडे होती. वयाच्या 12व्या वर्षापासूनच अभिलाष कविता लिहायला लागले होते. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी कवितांचे कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली.
अभिलाष यांना यकृताचा कर्करोग झाला होता. गेल्या 10 महिन्यांपासून आजार बळावल्याने ते अंथरुणाला खिळले होते. या आजारपणात जवळचे सगळे पैसे संपले. त्यांची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रखडली होती.




