जिनिव्हा : भारतातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर ‘युनिसेफ’च्या प्रमुखांनी भाष्य केलं आहे. भारतातील कोरोनाचा कहर ही सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा असून, जगाने आता पुढाकार घेऊन भारताला मदत केली नाही, तर याचे भारताबरोबरच जगावरही मोठे परिणाम होतील, असा इशारा ‘युनिसेफ’च्या प्रमुखांनी दिला आहे.
भारतातील दुःखद परिस्थिती ही सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे,’ असे युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिटा फोर म्हणाल्या. ही आपत्ती थांबविण्यासाठी तातडीची कारवाई आणि खंबीर नेतृत्व गरजेचे असल्याचे युनिसेफचे दक्षिण आशियाचे प्रादेशिक संचालक जॉर्ज लॅरीए अड्जेयी यांनी निवेदनात म्हटले आहे. युनिसेफने भारताला २० लाख फेसशील्ड आणि दोन लाख सर्जिकल मास्कसह अतिरिक्त अत्यावश्यक जीवनरक्षक औषधांचा पुरवठा केला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण नोंदवले जात असून, तीन हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. ‘युनिसेफ’च्या म्हणण्यानुसार, दक्षिण आशियामधील देशांत संसर्गाचे प्रमाण वाढत असले तरी, एकट्या भारतात ९० टक्के बाधा आणि मृत्यू होत आहेत. जगातील ४६ टक्के कोरोनारुग्ण भारतात असून, एकूण कोरोना मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू भारतात होत असल्याचे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवले आहे.




