गडचिरोली : कोरोनाचं संकट गडद होत असतानाच अनेक भागांना सातत्याने चक्रीवादळाचा तडाखा बसत असल्याने दुहेरी संकटात नागरिक सापडले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात मागच्या आठवड्यात काही भागात चक्रीवादळासह पावसाने धुमाकूळ घेतला आहे त्यामुळे घरांची पडझड तसेच पिकांचे नुकसान झाले होते. १ मे रोजी रात्री पुन्हा एकदा अचानक चक्रीवादळ आल्याने मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा गावातील नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावात जवळपास ४० ते ४५ घरांची पडझड झाली आहे. अचानक आलेल्या चक्रीवादळाने गावकऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे.
तर दुसरीकडे देसाईगंज तालुक्यातही चक्रीवादळ आणि गारपीट झाल्याने नुकसान झाले. जोगीसाखरा, पाथरगोटा, शंकरनगर, पळसगाव परिसरात शेतकऱ्यांच्या धान, मका, आंबे, केळी पिकाची अतोनात हानी झाली आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त गावकाऱ्यांकडून केली जात आहे. तर मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा येथे चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेक पक्ष्यांनाही जीव गमवावा लागला आहे.




