मुंबई : लॉकडाऊन लावण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र त्याबाबत चर्चा निश्चितच सुरू असते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकार अधिक कडक निर्बंध लादण्याचं पाऊल उचलणार आहे. त्यामुळं लोकांनी तशी मानसिक तयारी ठेवावी, असं सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. गर्दी टाळण्यासाठी काही कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे. अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आरोग्यमंत्री म्हणाले कि, “राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. काल २७ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली. त्यामुळं राज्य सरकार अधिक सतर्क झालं आहे. संपूर्ण लॉकडाऊन न करता कोरोनाचा संसर्ग कसा थोपवता येईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी कठोर निर्बंधांचा मार्ग अवलंबला जाणार आहे. गर्दी टाळणे हाच निर्बंध लावण्यामागचा मुख्य हेतू आहे. गर्दी कशी टाळता येईल. गर्दीच्या ठिकाणांवर कसे नियंत्रण ठेवता येईल, याबाबतचं नियोजन केलं जात आहे. हे नियोजन अंतिम झाल्यावर त्याबाबतची माहिती देण्यात येईल.”
ते पुढे म्हणाले कि, “सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळलं जावं या दृष्टिकोनातून पावलं उचलावी लागणार आहेत. गरजेनुसार त्याबाबतचे आदेश निर्गमित केले जातात. कोरोना रुग्णांची संख्या अशीच राहणार असेल आणि लोक असेच बेफिकिरीनं वागणार असतील तर निर्बंधांमध्ये कठोरता आणावीच लागेल. लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळणे हा एकमेव उपाय आहे. त्यामुळं नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा.
नियम पाळा आणि लॉक़डाऊन टाळा
लॉकडाऊनचा कोणताही निर्णय झालेला नाही, मात्र गर्दी टाळण्यासाठी काही कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे. अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. @rajeshtope11 यांनी स्पष्ट केले. #CoronaUpdate pic.twitter.com/ZopbCqmgTE
— NCP (@NCPspeaks) March 31, 2021




