अमरावती : तिवसा येथील सारसी सातरगाव रोड येथील वनविभागाच्या जंगलात गेल्या तीन दिवसांपासून भीषण आगीचे तांडव सुरू आहे. आज ही आग नियंत्रणात आणण्यासाठी गेलेली तिवसा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाची नवीन गाडी जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत नगरपंचायतीचे तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
अग्निशमन दलाच्या गाडीला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर चांदूर रेल्वे येथील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. सध्या आग नियंत्रणात आणण्यात यश आले असून मदतकार्य सुरु आहे.
घटनास्थळी जाऊन मुख्याधिकारी पल्लवी सोटे व माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी स्थितीचा आढावा घेतला. यावेळी वानखडे यांनी वनविभागाच्या बेजबाबदारपणामुळे या भागात आगीच्या घटना वाढल्या असून आनंदवाडी, अशोकनगर येथील लोकवस्तीला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे, असा दावा केला. तिवसासाठी स्वतंत्र अग्निशमन व्यवस्थेची मागणीही त्यांनी केली आहे.




