IND vs ENG ODI : भारतीय संघाने आज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अतिशय रोमांचक विजय मिळवला. भारताने 7 धावांनी सामना जिंकला. या विजयासह भारतीय संघाने २-१ ने मालिका देखील जिंकली.
भारताची प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात झाली. भारताला यावेळी शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर १०३ धावांची सलामी मिळाली होती. पण त्यानंतर भारताने ५४ धावांमध्ये चार विकेट्स गमावल्या आणि त्यांची ४ बाद १५७ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर ऋषभ पंत फलंदाजीला आला. त्याने धमाकेदार फलंदाजी करत ७८ धावा केल्या. हार्दिकने पंतला चांगली साथ दिली. यावेळी हार्दिकने ६४ धावांची खेळी केली. भारताने इंग्लंड समोर ३३० धावांचे आव्हान ठेवले.
३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीपासूनच धक्के बसत गेले. भुवनेश्वरने पहिल्याच षटकात जेसन रॉयला बाद केले. जॉनी बेअरस्टोलाही तिसऱ्या षटकात भुवनेश्वरनेच बाद केले आणि इंग्लंडची २ बाद २८ अशी अवस्था झाली. त्यानंतर टी. नटराजनने स्टोक्सला ३५ धावांवर बाद केले. त्यानंतर डेव्हिड मलानने ५० धावांची दमदार खेळी साकारली. परंतु, त्यानंतर शार्दुल ठाकूरने मलानसह कर्णधार जोस बटलर आणि लायम लिव्हिंगस्टोन यांना बाद केले. त्यानंतर सॅम करनने इंग्लंडला विजयाच्या जवळ नेलं, परंतु, अखेर तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.




