मुंबई : वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक पार पडली, त्यावेळी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांसह वनमंत्री संजय राठोडही उपस्थित होते. कॅबिनेट बैठकीनंतर वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. वर्षा बंगल्यावर सर्व शिवसेना नेत्यांची बैठक सुरु असल्यामुळे संजय राठोड यांच्याबद्दल काय निर्णय घेतला जाईल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर चर्चेत आलेले संजय राठोड काल पोहरादेवी येथे गेले होते. यावेळी संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. परंतु, संजय राठोड यांनी केलेलं शक्तीप्रदर्शन शरद पवार यांना आवडलं नाही. संजय राठोड प्रकरणाचा फटका मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिमेला होत असल्याचं शरद पवार यांचं मत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आता या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. एकूणच संजय राठोड यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याचं दिसत आहे.




