प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतलं. काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर साहिब ए निशाण ध्वज फडकावला. तर दुसरीकडे पोलीस आणि शेतकरी यांच्यात प्रचंड धुमश्चक्री झाली. या हिंसेमुळे दिल्लीत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, दिल्लीत मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्ली व हरियाणातील काही भागात मोबाईल सेवाही बंद करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर राज्यातील कायदा व सुरक्षाव्यवस्था कोणत्याही किंमतीत कोलमडता कामा नये, असे आदेश राज्याच्या पोलीस विभागाला दिले आहेत. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुक्राल यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे.
CM @capt_amarinder orders high alert in Punjab amid Delhi violence during #KisanTractorRally, asks @DGPPunjabPolice to ensure law & order is maintained at all costs. #TractorRally #FarmerProtests pic.twitter.com/iqCoZwnRby
— Raveen Thukral (@RT_MediaAdvPbCM) January 26, 2021




