अंबरनाथमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडी अडवल्याच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार करण्यात आले. शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्याच्या बाहेर हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
बाळू चव्हाण असं या घटनेत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. चव्हाण हे शुक्रवारी रात्री ड्युटी संपवून उल्हासनगरहून बदलापूरला आपल्या घरी जायला निघाले होते. त्यावेळी अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या बाहेर वाहतूक कोंडी झाली असताना एका कारमध्ये चार रेकॉर्डवरील गुन्हेगार रक्ताने माखलेल्या अवस्थेत बसलेले त्यांना आढळले. यावेळी त्यांनी चौघांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता या चौघांनी गाडीतून उतरून त्यांच्या डोक्यात तलवारीने वार केले. यानंतर एका रिक्षाचालकाला तलवारीचा धाक दाखवत त्याची रिक्षा घेऊन हे चौघे पसार झाले.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या आरोपींनी एक गाडी फोडली, तिथून एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर त्यांनी हल्ला केला. इतकंच नाही तर उल्हासनगरच्या शिवाजी चौकात एक लाल रंगाच्या आय ट्वेन्टी गाडीची काच फोडत चालकाचं अपहरण करून ते अंबरनाथला आले. आणि त्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचारी बाळू चव्हाण यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपींना पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत उल्हासनगरमधून बेड्या ठोकल्या. या आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून धारदार शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.




