उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. १९ वर्षीय दलित तरुणीची १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली.
पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या भावाने इंडियन एक्स्प्रेशी बोलताना सांगितलं कि, “माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असं दिसतंय. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीयेत. अखेरचं एकदा तिचं पार्थिव घरी आणलं जावं यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही”.
रात्री १० वाजता पीडित तरुणीचं पार्थिव रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याआधी पीडित तरुणीच्या वडील आणि भावाकडून रुग्णालयाबाहेर निदर्शन करण्यात आलं. त्यांच्यासोबत काँग्रेस तसंच भीम आर्मीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांनी यानंतर काही संघटनांनी या मुद्द्यावर राजकारण सुरु केलं असल्याचा आरोप केला.
तरुणीच्या मृत्यूपूर्वी कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं होतं की, १४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती.
पोलिसांनी सुरुवातीला फक्त जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २३ तारखेला तरुणीच्या जबाबानंतर एफआयआरमध्ये सामूहिक बलात्काराचे कलम जोडण्यात आले. पोलिसांनी पीडित मुलीच्या घराजवळील तीन व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यातील एकजण फरार झाला होता, त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.




