राजकीय संबंधापोटी ठेकेदारांना रोहित पवार पाठीशी घालतात असा घणाघाती आरोप भाजपणे केला आहे. सोलापूर महामार्गावरील कर्जत मिरजगाव येथील झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या दुरुस्ती कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
सुरत – विशाखापट्टणम महामार्गासाठी देशाचे पंतप्रधान तसेच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि खासदार सुजय विखेपाटील यांच्या प्रयत्नातून १२००० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, या महामार्गातून अहमदनगर – सोलापूर महामार्गाचा समावेश आहे. परंतु कायदेशीर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे काम चालू होणार नाही, मात्र असे असले तरी सदर महामार्गावर दुरुस्ती खर्चाची जबाबदारी ही राज्य सरकारची असल्याने सरकारने यावर अद्याप पर्यंत फ़क्त ४५ लाख रुपयांचा निधी खर्च करून फ़क्त १२०० मीटर अंतराच काम केलं आहे, हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असून १५ दिवसांत केलेल्या रस्त्याचा कामावर खड्डे पडले आहे, दरम्यान या संदर्भात वेळोवेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना तक्रारी देवून सुद्धा ते संबधित अधिकारी आणी ठेकेदारांवर कोणतीही कारवाई न करता संबंधितांना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचा घणाघात भाजपाने दिलेल्या निवेदनात केला आहे.
दरम्यान सोलापूर महामार्गावरील अहमदनगर ते जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्यावरील सर्व खड्डे भरण्यासाठी जबाबदारी ही राज्य सरकारची असून सरकार मधले असलेले आमदार रोहित पवार यांनी देखील आपली जबाबदारी इतरांवर न ढकलता समर्थपणे सांभाळावी आणि जनतेला होणाऱ्या त्रासापासून मुक्ती द्यावी अशी प्रतिक्रिया भाजपाच्या वतीने देण्यात आली आहे. रस्त्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनावेळी भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




