जालना : आरक्षण मिळेपर्यंत मी आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. समितीच्या अहवालानुसार नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि इतरांना नाही, ही भूमिका आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
मनाेज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले कि, “विखे पाटील यांनी माझ्याशी संवाद साधला आहे. समितीचा प्रथम अहवाल स्वीकारला आहे. मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलाविली आहे. त्यावर आपण त्यांना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. एका भावाला आरक्षण आणि दुसऱ्याला नाही, अशी आमची इच्छा नाही. सरकारचीही असू नये. अन्यथा मी आंदोलन थांबविणार नाही. समितीच्या अहवालाला राज्य मागास वर्ग आयोगाचा दर्जा देवून तो अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय उद्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत करावा.”




