अहमदनगर : अहमदनगर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील एकल महिलांना विविध कल्याणकारी योजना देण्यासाठी ग्रामपंचायत व अंगणवाडी मार्फत गावपातळीवर एकल महिलांचे सर्वेक्षण केले. त्यात १ लाख ७२६ महिला आढळल्या आहेत. जिल्ह्यातील एकल महिलांचा इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करणारा अहमदनगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. ग्रामीण भागात विधवा घटस्फोटीत परित्यक्ता महिलांची इतकी मोठी संख्या यानिमित्ताने प्रथमच एकत्रित प्रशासनाच्या नजरेस आली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करून विविध योजना राबवणे शक्य होईल. हे सर्वेक्षण करून न थांबता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठक आयोजित करून पुनर्वसन कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली. लवकरच कृती आराखडा जाहीर करण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी पुढाकार घेऊन सर्व ग्रामपंचायतींना गावातील विधवा घटस्फोटीत व परित्यक्ता व स्वेच्छेने अविवाहित राहिलेल्या महिलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. ग्रामविकास अधिकारी यांनी अंगणवाडी सेविकांच्या मदतीने गावातील अशा महिलांची माहिती जमवली. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात ८७,२८७ विधवा महिला, ५६४९ घटस्फोटीत महिला ,६४९२ परित्यक्ता महिला, १,२९८ अविवाहित मोठ्या वयाच्या महिला आहेत. अशा एकूण १ लाख ७२६ एकल महिला आहेत. घटस्फोटीत व परित्यक्ता यांची संख्या अकोले तालुक्यात सर्वात जास्त आहे.




