मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या पोटनिवडणुकीतून माघार घ्यायची की नाही, याबाबत चर्चा करण्यासाठी भाजपची आज सकाळी 11 वाजता बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. थोड्याच वेळात ते प्रत्यक्ष अर्ज मागे घेणार आहेत.
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानते. माझे पती रमेश लटके यांच्या कामाबद्दल, त्यांचे सर्वांशी असणारे सहकाराचे नाते, यामुळे आज मला हा आशीर्वाद मिळाला. सर्व पक्ष आणि कार्यकर्त्यांना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे वाटत होते. सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानू इच्छिते. माझ्या पतींनी नेहमी जनसेवा केली. माझाही ध्यास अंधेरीचा विकास हाच असेल. भाजपचेही मी आभार मानते. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मी आशीर्वाद घेईन.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचे उमेदवार मुरजी पटेल यांना माघार घ्यावी, असे आवाहन दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या स्मरणार्थ केले, ज्यांच्या मृत्यूमुळे ही निवडणूक आवश्यक आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवंगत आमदार यांच्या पत्नी रुतुजा लटके यांना मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.




