मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान आता खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले कि, तुमचं म्हणणं आहे ना, आघाडीतून बाहेर पडा, नक्की विचार करु, पुढच्या २४ तासांत बंडखोर आमदारांनी मुंबईत यावं. तुमची अधिकृत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी. मोबाईलवरुन, व्हॉट्सअॅपवरुन तुमच्या मागण्या मांडण्यापेक्षा समोर येऊन तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या मांडा, तुमच्या मागण्यांचा उद्धव ठाकरे नक्की विचार करतील.
जे आमदार या क्षणी महाराष्ट्राच्याबाहेर आहेत, या सर्व आमदारांची इच्छा असेल की महाविकासआघाडीतून शिवसेनेने बाहेर पडले पाहिजे आणि वेगळा विचार केला पाहिजे, तर त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल. पण त्यांनी मुंबईत येऊन ही मागणी मांडावी. महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुमच्या मागणीचा उद्धव ठाकरे विचार करतील. हे मी जबाबदारीने सांगत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्ही शेवटपर्यंत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहू, अशी भाषा करत आहेत. मात्र, शिवसेना आता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी दर्शवित असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता आहे.




