नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पोलीस सेवा(आयपीएस) प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. यात पंतप्रधान मोदींनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गृह राज्यमंत्री नित्यानंद रायही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, लोकांची पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक धारणा हे एक मोठं आव्हान आहे आणि ही प्रतिमा बदलण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी काम करणे आवश्यक आहे.
सररदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमधील आयपीएस प्रशिक्षणार्थींशी ऑनलाईन संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आमचे पोलीस कर्मचारी देशाच्या सुरक्षेसाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि दहशतवादाशी लढण्यासाठी आपले प्राणही अर्पण करतात. ते कित्येक दिवस घरी जाऊ शकत नाहीत, सणांच्या वेळीही ते घरी जाऊ शकत नाहीत, परंतु जेव्हा पोलिसांच्या प्रतिमेचा प्रश्न येतो तेव्हा लोकांची धारणा वेगळी असते. सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक प्रतिमा सुधारणे हे एक मोठे आव्हान आहे. कोविडच्या सुरुवातीला, ही धारणा थोडी बदलली होती, पोलीस गरीब आणि गरजूंना मदत करत होते. तरीही नकारात्मकता कायम आहे. यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणं ही नव्या पिढीची जबाबदारी आहे.”
Interacting with IPS probationers. https://t.co/B8Afcv9242
— Narendra Modi (@narendramodi) July 31, 2021
पंतप्रधान मोदी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की, राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम हे तुमच्या प्रत्येक कृतीतून नेहमी प्रतिबिंबत व्हायला हवं. कामगिरीवर असताना राष्ट्रहीत कायम डोक्यात ठेवूनच निर्णय घ्यायला हवेत. तुम्ही हे कायम लक्षात ठेवायला हवं की तुम्ही एक भारत, श्रेष्ठ भारताचे ध्वजवाहक आहात. यामुळे तुमच्या प्रत्येक पावलात आणि प्रत्येक हालचालित Nation First, Always First ची भावना दिसली पाहिजे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
यंदाचा १५ ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन हा आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे ७५ वे वर्ष आहे. गेल्या ७५ वर्षांत भारताने एक चांगली पोलिस सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस प्रशिक्षणासाठी निगडीत पायभूत सुविधांमध्येही अलिकडच्या वर्षांमध्ये मोठ्या सुधारणा झाल्या आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.




