जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात ITBP जवानांनी भरलेल्या बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 39 कर्मचारी घेऊन जाणारी सिव्हिल बस ब्रेक निकामी झाल्याने नदीच्या काठावर पडली. यात इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (इतबाप) चे 37 आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या 2 जणांचा समावेश आहे. या अपघातात तब्बल 6 ITBP जवानांचा मृत्यू झाला असून सुमारे 32 जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सैनिक चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. यात अनेक जवान जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या बचावकार्यासाठी कमांडो पाठवण्यात आले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्याचे काम सुरू आहे. ब्रेक निकामी झाल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नदीच्या पात्रात खाली कोसळून ही दुर्घटना घडली.
ज्या ठिकाणी हा अपघात झाला, ते पहलगामपासून 16 किमी अंतरावर आहे, हे ठिकाण अमरनाथ यात्रेचा प्रारंभ बिंदू मानले जाते. हे जवान अमरनाथ यात्रेची ड्युटी संपवून परतत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि सैनिकांनी भरलेली बस पलटी होऊन थेट नदीच्या काठावर कोसळली, अनेक फूट खोल खड्ड्यात पडल्याने बसचा चक्काचूर झाला आहे. मात्र, यामागे कोणते षडयंत्र आहे का? याचाही तपास गुप्तचर विभाग करत आहे.




