उत्तर प्रदेश : कुशीनगर जिल्ह्यातील नेबुआ नौरंगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. एका हळदी समारंभासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक जमले असतानाच विहिरीवरील जाळी तुटून अनेक जण त्यात कोसळले व त्यातील किमान १३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून मदत आणि बचावकार्य तत्काळ सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जखमींवर वेगवान उपचार होतील यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे, असेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेबुआ नौरंगिया स्कूल टोला येथे एका घरात बुधवारी हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान विहिरीवरही पूजाविधी केला जातो. त्यासाठी मोठ्या संख्येने घरातील मंडळी, शेजारी तसेच नातेवाईक विहिरीजवळ जमले होते. त्यात अनेक मुली व महिला विहिरीच्या जाळीवर उभ्या होत्या. ही लोखंडी जाळी अधिक वजनामुळे तुटली आणि जाळीवरील सर्वजण खोल विहिरीत कोसळले. रात्री ९ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्थानिकांनी मोठी शिडी आणून तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले. पाठोपाठ स्थानिक प्रशासन तसेच अग्निशमन जवानही घटनास्थळी दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेत जवळपास ३० जण जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.




