खासदार संजय राऊत यांच्यावर एका उच्चशिक्षित महिलेने अतिशय गंभीर आरोप केले आहेत. शुक्रवारी या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याविषयी तक्रार करणारा अर्ज दाखल केला आहे. आपल्या मागे माणसे लावणे, छळवणूक, हेरगिरी करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न, धाक दाखविणे तसेच विनयभंग केल्याचाही आरोप या महिलेने केला आहे. यासंदर्भात न्यायालयाने चार मार्चला पुढील सुनावणीचे आदेश दिले.
महिलेने याचिकेत म्हटले आहे कि, “मी सन २०१३ मध्ये माझ्या रेस्टॉरंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्याविषयी माहिम पोलिस ठाण्यात आणि २०१८मध्ये माझ्या कारवर झालेल्या हल्ल्याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता. मात्र, पोलिसांनी याबाबत पुढे कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी संजय राऊत यांचा साधा जबाबही नोंदवला नाही. मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या या छळवणुकीविषयी गेल्या वर्षी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दाद मागितली. मात्र, काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मी राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली. आयोगाने एफआयआर नोंदवून कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, बीकेसी-परिमंडळ ८च्या पोलिस उपायुक्तांनी त्याची आजतागायत दखल घेतली नाही. म्हणून नाईलाजास्तव उच्च न्यायालयात दाद मागावी लागत आहे.” अॅड. आभा सिंग यांनी न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे हा अर्ज दाखल केला. आता चार मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.




