मुंबई, दि. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना मांडून भारताला सशक्त करण्यासाठी मोठे अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल म्हणून या अभियानाला चालना देण्यासाठी विद्यापीठाने आत्मनिर्भर विद्यापीठ होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हटले कि, रोजगार निर्मितीसाठी संशोधन करून विद्यापीठाने कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार करावेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरच विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. जपानसारख्या देशांनी स्वतः ची नॉलेज बँक तयार केली आणि कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. त्याच धर्तीवर विद्यापीठाने कौशल्य आधारित अभ्यासक्रम, सेवा, रोजगार निर्मिती यावर विशेष लक्ष देऊन रोजगार निर्मितीसाठी सहकार्य करावे, यासाठी शासन वित्तीय सहकार्य करेल.