मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. आमच्याकडे राखेतून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आहे. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? सत्ताही परत मिळवता येईल. पण पक्षाची प्रतिष्ठा ही आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले कि, “एकनाथ शिंदे हे सध्या आमच्यापासून लांब आहेत, ते जवळ आल्यावर आम्ही त्यांच्याशी बोलू. मी काल एकनाथ शिंदे यांच्याशी तासभर फोनवरून चर्चा केली. आमच्यात अत्यंत चांगल्या वातावरणात चर्चा झाली. एकनाथ शिंदे हे माझे फक्त सहकारी नव्हेत तर मित्रही आहेत. आम्ही गेली ३५-४० वर्षे एकत्र काम करतोय. उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांचे असेच नाते आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आमदार प्रथम सूरत आणि आता गुवाहाटीमध्ये गेले आहेत. आमदारांनी पर्यटन करणे ही चांगली गोष्ट आहे. पण ते परत येतील.”
तसेच एकनाथ शिंदे हे स्वगृही परत येतील. एकनाथ शिंदे यांना शिवसेना सोडणं आणि आम्हाला त्यांना सोडणं, या दोन्ही गोष्टी खूप अवघड आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसैनिकच म्हणून संपूर्ण आयुष्य काढतील, असा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.




