पुणे : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. आज अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
अजित पवार यांनी सांगितले कि, “पुण्यातील ससून रुग्णालयात सर्वाधिक रूग्ण नगरचे आहेत. नगरचे जवळपास ४० टक्के रुग्ण आहेत. यात संगमनेर आणि पारनेर या दोन तालुक्यांतील सर्वाधिक रूग्ण आहेत. याबाबत नाशिक आणि नगर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, तसेच रूग्णांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांना चाचण्यांसाठी मदत हवी होती. नगर जिल्ह्यात संगमनेर, पारनेरमध्ये रुग्णसंख्या वाढतेय. तिथे कठोर निर्बंध लागू करा आणि कोरोना संसर्ग रोखा, असे निर्देश देखील देण्यात आले आहेत.”
अजित पवार पुढे म्हणाले कि, “ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात एक कोविड आणि इतर नॉन कोविड रुग्णालयं सुरू करावीत असं सांगितलं आहे. शाळांमधून कोविडबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून मुलं त्यासंदर्भातली काळजी घेतील. शाळा ४ तारखेपासून सुरू होणार असून अजून पालक हे पाल्यांना शाळेत पाठवण्याच्या तयारीत नाहीत. त्यांची मानसिकता दिवाळीनंतर पाठवण्याची आहे.




