नागपूर : “अहो ऐका ना, एक सेल्फी घ्या!” असं म्हणत पुलावर थांबलेल्या महिलेने काही क्षणांतच नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. कन्हान नदीवरील नेरी पुलावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मृत महिलेचे नाव ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय २३) असून, त्या सध्या नागपूरच्या मानेवाडा परिसरात पतीसोबत राहत होत्या. मूळच्या त्या रामटेक तालुक्यातील काचूरवाही गावच्या रहिवासी होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास विजय साकोरे पत्नी ज्ञानेश्वरी यांच्यासह कारमधून काचूरवाही गावाकडे जात होते. वाटेत नेरी पुलावर दोघांनी गाडी थांबवून काही वेळ घालवला. यावेळी त्यांनी मोबाईलवर सेल्फी देखील घेतला. त्यानंतर नदीत निर्माल्य विसर्जित करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, निर्माल्य टाकतानाच ज्ञानेश्वरी यांनी कोणालाही काही समजण्याच्या आत पुलावरून थेट नदीत उडी मारली. हा प्रसंग पती विजय यांच्या डोळ्यासमोर घडला. त्यांनी आरडाओरडा करत मदतीची हाक दिली.
घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गोताखोरांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र सायंकाळपर्यंत महिलेचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अंधार पडल्याने शोध थांबवावा लागला. रविवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली.
प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी विजय साकोरे यांचा जबाब नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे.
शनिवारी दिवसभर आणि रविवारी सकाळी अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पुलावर काढलेला सेल्फी आणि नंतर घडलेली ही दुर्दैवी घटना सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनली आहे.
या घटनेबाबत कोणत्याही प्रकारचा अपप्रचार करू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.




