मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. विस्तारानंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्तांसाठी अतिशय महत्त्वपू्र्ण निर्णय घेतला. दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत तसेच एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
आपले मंत्रिमंडळ हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न करेल, असे यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि मंत्र्यांनी आपआपली जबाबदारी गांभिर्यपूर्वक पार पाडावी आणि महाराष्ट्राचा देशात नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्य मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांनी आज मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे स्वागत केले.
अतिवृष्टीग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा
गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.




