मुंबई : राज्यातील सात जिल्ह्यांत आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या सर्व रुग्णांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. सर्वांना लगेचच विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. यातील काही रुग्ण बरे झालेले आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. केंद्र सरकारकडून मंगळवारी याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या असून महाराष्ट्राला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे शरिरातील अँटिबॉडिज कमी होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या सर्व २१ रुग्णांना विलगीकरणात ठेवले आहे. या रुग्णांची सर्व माहिती घेतली जात आहे. ट्रॅव्हल हिस्ट्री जाणून घेताना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही केले जात आहे. यापैकी कुणी लस घेतली आहे का? याचीही माहिती घेण्यात येत आहे. जीनोमिक सीक्वेन्स स्टडी साठी नमुने पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्हेरिएंटची लागण होऊन अद्याप एकही मृत्यू झालेला नाही तर काही रुग्ण पूर्ण बरे झालेले आहेत. या व्हेरिएंटची लक्षणे आणि त्यावरील उपचार सारखेच आहेत. तसेच लहान मुलांना या व्हेरिएंटची लागण झालेली नाही, असे टोपे यांनी सांगितले.
राजेश टोपे यांनी पुढे सांगितले कि, “सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत असून दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातून काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. आतापर्यंत ३ हजार ४०० नमुने पाठवले गेले, त्यात २१ रुग्णांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे आढळले आहे. तरी दक्षता बाळगली जात असून नव्या व्हेरिएंटबाबतची सर्व माहिती केंद्र सरकारला पाठवण्यात येत आहे.”




