अमरावती : मेळघाटात मालवाहक पिकअप झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना ज्या परिसरात घडली तो घाट हा अतिदुर्गम भागात येतो.
सातपुड्यात असलेल्या धारणी तालुक्यातील ग्राम सुसरदा येथे मोठा आठवडी बाजार भरत असतो. यासाठी अकोट शहर, अंडगाव, हिवरखेड आणि आसपासच्या परिसरातील भाजी विक्रेते विक्रीकरिता जात असतात. आज ३ ऑगस्ट २०२२ रोजी नेहमीप्रमाणे बाजार आटोपून परत येत असताना संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास राणेगाव घाटात मालवाहक पिकअप झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर तब्बल १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
अपघातातची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. जखमींना नागरिकांच्या मदतीने तातडीने धारणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.




