संगमनेर : कै. विनायक शिवराम आव्हाड गुरुजी यांच्या स्मरणार्थ आज (2 जुलै) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिबलापुर येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन, पेन्सिल आणि इतर शालोपयोगी स्टेशनरी साहित्य वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे साहित्य वाटण्यात आले. सर्वच विद्यार्थ्यांना एकसमान व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी या साहित्याची मोठी मदत होईल. या उपक्रमातून आव्हाड कुटुंबियांकडून एक आदर्श ठेवण्यात आला आहे.
यावेळी शिबलापुर गावचे माजी सरपंच दिलावर शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोंद्रे, युवक कार्यकर्ते राजेंद्र सुखदेव नागरे, ज्ञानदेव गंगाराम नागरे, विश्वास मुन्तोडे, दिपक नागरे, शिवाजी आनंदा नागरे (से.नि. सहाय्यक फौजदार), भिमराज सांगळे (स्था. स्कूल कमिटी अध्यक्ष), राहुल मुन्तोडे, आव्हाड कुटुंबियांच्या वतीने निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक विनायक आव्हाड, शिवाजी विनायक आव्हाड (सेवानिवृत्त आदर्श शिक्षक), भाग्यश्री आव्हाड, सिद्धार्थ आव्हाड, अक्षय आव्हाड, संदीप पाटील (औरंगाबाद), तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भुसाळ मॅडम, वाकचौरे सर, मुठे सर, पिचड सर, नागरे मॅडम आदी. उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोंद्रे यांनी यावेळी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आव्हाड कुटुंबियांचे आभार मानण्यात आले.
शिक्षण हे वाघिणीचे दूध असते, हे आव्हाड गुरुजींनी नेहमी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदांवर कार्यरत आहेत. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या गुरुजींचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या निधनानंतर रोजंदारी करून दोन भावांचा सांभाळ केला. स्वतःचे आणि भावांचे शिक्षण पूर्ण केले आणि भावाला पोलीस सेवेत रुजू केले. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण शिक्षित असून गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेवून समाजोपयोगी कामे करत आहेत. -दिलावर शेख (माजी सरपंच, शिबलापूर)




