अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला एक महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊन गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३६ जणांची चौकशी केली आहे. मात्र अद्याप सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. परिणामी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करत एक पत्र देखील लिहिलं होतं. त्यांच्या या पत्राला आता नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं आहे.
“आम्हाला तुमचं पत्र २० जुलै रोजी मिळालं”, असं उत्तर एका पत्राद्वारे नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. पंतप्रधानांनी सुब्रमण्यम स्वामींच्या पत्राची नोंद घेतल्यामुळे आता सुशांतच्या केसला आणखी गती प्राप्त होईल व खरे गुन्हेगार लवकरच पकडले जातील असं म्हटलं जात आहे.
सुब्रमण्यम स्वामी पत्रामध्ये म्हणाले
तुम्हाला सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची कल्पना आहेच. माझे सहकारी इशकराम भंडारी यांनी सुशांत सिंहच्या कथित आत्महत्येच्या परिस्थितीसंबंधी रिसर्च केला आहे. पोलीस एफआयआर दाखल केल्यानंतर सुशांत सिंहने कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली याचा तपास करत आहेत. पण मुंबईतील माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं ज्यांचे दुबईतील डॉनशी संबंध आहेत ते पोलिसांकडून ही ऐच्छिक आत्महत्या होती हे दाखवण्यासाठी मदत मागत आहेत” असं सुब्रहमण्यम स्वामी यांनी पत्रात म्हटलं होतं. त्यांच्या या पत्राची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.




