शिर्डी : शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या शिर्डी ते आळंदी पालखीला संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावरील 19 मैल जवळ अपघात झाला. पालखी आळंदीकडे जात असताना मागून भरधाव वेगाने आलेला कंटेनर थेट पालखीत घुसल्याने हा भयंकर अपघात झाला. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील १९ मैल (खंदरमाळवाडी) परिसरात रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर नऊ वारकरी जखमी झाले आहेत. जखमींवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची नावे :
- भाऊसाहेब नाथा जपे (कनकुरी)
- बाळासाहेब अर्जुन गवळी (मढी बु,ता.कोपरगाव)
- बबन पाटीलबा थोरे (द्वारकानगर,शिर्डी)
- ताराबाई गंगाधर गमे (कोऱ्हाळे,ता.राहता)
शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज हे दरवर्षी शिर्डी ते आळंदी श्री साईबाबा पालखी सोहळा गेल्या 36 वर्षांना पासून आयोजित करतात. यंदा 37 वे वर्ष आहे. या पालखीत, नाशिक, शिर्डी, अहमदनगर जिल्ह्यात साधरणात 250 ते 300 वारकरी सहभागी झाले होते. ही पालखी गुरुवारी शिर्डीतून आळंदीच्या दिशेने रवाना झाली होती. पालखी संगमनेर तालुक्यातील पुणे- नाशिक महामार्गावरील 19 मैल येथे पोहचली असतांना अचानक भरधाव वेगाने नाशिकच्या दिशेने पुण्याकडे जात असलेला कंटेनर थेट पालखीत घुसल्याने हा अपघात झाला.
कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात :
या अपघाताला कारणीभूत असणारा कंटेनरचा चालक नशेत असल्याने त्याला डुलकी लागल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातातील मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांची ओळख पटली असून कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली.




