माणगाव : मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर नजीक कशेडी घाट रस्त्यावर चोळई गाव हद्दीत भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालकासह 3 विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला आहे. परिक्षा देऊन या तिन्ही विद्यार्थिनी घरी चाललेल्या होत्या. या अपघातामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कशेडी घाट मार्गावर चोळई गावच्या वळणावर हा अपघात घडला. वाळूने भरलेला डंपर अचानक रिक्षावर उलटला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये उमर बडुर रीक्षा चालक आणि हलिमा पोतेरे (23 राहणार, नांदवी), असिया बडुर (20 रा. गोरेगाव), नाजनिन करबेलकर (वय 23 रा. टेमपाले) अशी मृतांची नाव आहेत.
माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील या विद्यार्थिनी रिक्षाने खेड येथे परिक्षेसाठी गेल्या होत्या. परीक्षा आटोपून परतत असताना हा अपघात झाला. कशेडी घाट रस्त्यातील चोळई गावच्या वळणावर वाळूने भरलेला डंपर रिक्षावर उलटला. त्यात चिरडून चौघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली असून चारही मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.



