बिहार : बिहारमधील दीनदयाल उपाध्याय-गया रेल्वे मार्गावर रेल्वे अपघात झाला. रोहतास जिल्ह्यातील कुमहाऊ रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सकाळी मालगाडीचे सुमारे 20 डबे रुळावरून घसरले. त्यामुळे या रेल्वे मार्गावरील गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 6.30 च्या सुमारास पंडित दीनदयाल उपाध्याय विभागातील DDU-गया ग्रँड चोर्ड रेल्वे विभागाच्या कुमहाऊ स्टेशनवर मालगाडीच्या 20 बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातामुळे अप, डाऊन आणि रिव्हर्सल अशा तिन्ही मार्गिका विस्कळीत झाल्यामुळे या विभागावरील गाड्यांचे संचालन विस्कळीत झाले आहे. अपघातामुळे अनेक प्रवासी गाड्या डीडीयू जंक्शन आणि इतर स्थानकांवर उभ्या आहेत. विभागीय आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांची टीम लवकरच घटनास्थळी पोहोचत आहे. अपघातामुळे रुळ उखडले आहेत. दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.




