ठाणे : उल्हासनगर येथे एका साडेचार वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलाच्या आईसोबत झालेल्या वादाच्या रागातून मुलाची हत्या केल्याचे तपासात उघड झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून आरोपी कांचनसिंग पासी याला अटक केली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील हनुमान नगर परिसरात २४ वर्षीय कांचनसिंग आणि मृत मुलाचे कुटुंब राहते. मृत मुलाची आई आणि कांचनसिंग हे दोघेही उल्हासनगर येथील एका बिस्किट कारखान्यात कामाला होते. दरम्यान, १६ एप्रिल रोजी कांचनसिंग आणि मृत मुलाची आई यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपी कांचनसिंग याला महिलेचा प्रचंड राग आला आणि त्याने भयंकर कृत्य केले. आरोपी कांचनसिंग याने २० एप्रिल रोजी साडेचार वर्षांच्या या चिमुकल्याला आईस्क्रीम देतो सांगून आपल्यासोबत नेले. त्यानंतर अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात झुडपात नेऊन त्याची गळा दाबून हत्या केली. त्याचा मृतदेह तिथेच टाकून कांचनसिंग उत्तर प्रदेशात त्याच्या मूळ गावी पळून गेला.
मुलगा बेपत्ता झाल्याने मुलाच्या आई-वडिलांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्याचवेळी ऑर्डनन्स परिसरात अंबरनाथ पोलिसांना एका लहान मुलाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह अपहरण झालेल्या मुलाचाच असल्याचे समजले. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता मुलाच्या आईचे आरोपी कांचनसिंग याच्यासोबत चार दिवसांपूर्वी भांडण झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी कांचनसिंगचा शोध घेतला असता तो उत्तर प्रदेशमध्ये असल्याचे समजले. उल्हासनगर पोलिसांच्या तपास पथकांनी उत्तर प्रदेशात जाऊन प्रयागराज इथून कांचनसिंग पासी याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर त्याने या साडेचार वर्षांच्या मुलाचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. त्याच्याविरोधात अपहरण, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.




